नागरिकांना शांतता हवी आहे : उमर अब्दुल्ला   

श्रीनगर : सीमेवरील नागरिकांना शांतता हवी आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदी अशीच कायम राहिली पाहिजे, असे मत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी व्यक्त केले. कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागात ते पत्रकारांशी बोलत होते. ओमर अब्दुल्ला म्हणाले, सीमारेषेजवळ राहणारे नागरिक, जम्मू-श्रीनगरमधील परिस्थिती पाहणार्‍या अनेकांना युद्धबंदी व्हावी हीच इच्छा आहे. युद्धात नुकसान झालेल्यांना सरकार मदत करेल. जिल्हा प्रशासन या नुकसानीचे पंचनामे करत आहे. सरकार लोकांसाठी वैयक्तिक बंकर बांधण्याचे धोरण तयार करेल. याआधी असे सामुदायिक बंकर बनविण्यात आले होते; पण ते बर्‍याच काळापासून वापरले गेले नाहीत. अनेक वर्षांपासून एकही नवीन बंकर बांधले गेले नाहीत. सरकार यावर धोरण तयार करेल आणि सीमेजवळील या भागातील नागरिकांसाठी एक योजना तयार करेल आणि नंतर ती केंद्र सरकार समोर मांडली जाईल, असे ते म्हणाले. 
 
यावेळी अब्दुल्ला यांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांना मदतीचे आश्वासन दिले. तंगधारच्या गोळीबारग्रस्त भागांना भेट दिली. सरकार त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहे, त्यांच्या वेदना दुर्लक्षित केल्या जाणार नाहीत. त्यांना सन्मानाने आणि नवीन आशेने त्यांचे जीवन पुन्हा सुरू करण्यास मदत शक्य ती पाऊले उचलली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles